पंढरपूर(दि.4) बालाजी फुगारे
गावाच्या मूलभूत विकासासाठी रस्त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. याच दृष्टीने माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून माढा तालुक्यातील तब्बल 208.2 किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला.नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हा आदेश दिला आहे.या निर्णयामुळे आता या रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे माढा तालुक्यातील शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होऊन सोयीसुविधेत वाढ होणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे माढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, हा निर्णय हा केवळ रस्ते दळणवळणापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) पुणे मंडळाच्या प्रस्तावानुसार व जिल्हा परिषद सोलापूरच्या ठरावाच्या अधीन राहून शासनाने हा निर्णय घेतला असून त्यामुळे माढा तालुक्यातील रस्ते विकासाला मोठी गती मिळणार आहे.एकूण 4749.170 कि.मी. प्रमुख जिल्हा मार्गांच्या यादीत सोलापूर जिल्ह्याचा समावेश.
या निर्णयामुळे
1. माढा तालुक्यातील महत्त्वाचे गावोगावचे रस्ते आता प्रमुख जिल्हा मार्गांत समाविष्ट झाले.
2. रस्त्यांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण व नव्याने होणाऱ्या विकासकामांसाठी निधी मिळण्यास प्राधान्य.
3. शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाला सोयीसुविधा.
"माढा तालुक्याचा शाश्वत विकास हाच माझा ध्यास आहे. शासनाच्या स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून मिळवलेला हा निर्णय माढा तालुक्याच्या जनतेसाठी एक मोठा टप्पा आहे. या रस्त्यांवर दर्जेदार विकासकामे करून नागरिकांना सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील तसेच शासनाने दिलेला हा दर्जा केवळ रस्त्यांपुरता मर्यादित नसून, तो माढा तालुक्यातील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाचा नवा मार्ग मोकळा करणारा ठरणार आहे. यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अधिकारी वर्ग व शासनाचे मनःपूर्वक आभार.. ."– आमदार अभिजीत पाटील,माढा विधानसभा मतदार संघ.

Post a Comment
0 Comments